शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्री शिंदेंसोबत ध्वजारोहण , नंतर स्मारकास अभिवादन औरंगाबाद :मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमातही शिंदे गट विरुद्ध उद्धव गट असे वादाचे दर्शन घडले . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सकाळी सात वाजता ध्वजारोहण केले . त्यावेळी राजशिष्टाचाराचा भाग म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित राहिले . पण हैदरबादला जाण्यासाठी शिंदेंनी दरवर्षीच्या वेळेचा नियम डावलून मराठवाड्याचा अपमान केला , असा आरोप करत दानवेंसह शिवसेनेच्या इतर नेत्यांनी सकाळी नऊ वाजता हुतात्मा स्मारकाला स्वतंत्रपणे अभिवादन केले . दरवर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सकाळी नऊ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो . मात्र या वेळी सकाळी ७ वाजताच कार्यक्रम घेतला . १५ मिनिटांतच हा कार्यक्रम आटोपता घेतला . यावर शिवसेनेकडून आक्षेप आला . म्हणून शिवसेनेच्या वतीने पुन्हा नऊ वाजता घेण्यात नेहमीच्या वेळेप्रमाणे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन अभिवादनाचा कार्यक्रम घेतला . हैदराबादमध्ये महाराष्ट्र , तेलंगण आणि कर्नाटक या तीन राज्यांचा मिळून मुक्तिसंग्रामाचा एक संयुक्त कार्यक्रम होणार आहे . या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील हजेरी लावणार आहेत . तिथे वेळेत पोहोचता यावं यासाठी औरंगाबादमधील ध्वजारोहणाचा कार्यक्रम लवकर घेण्यात आला , असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला . तर या वेळी कुठल्याही ठोस घोषणा न करता कागदोपत्री भाषण करत त्यांनी मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला . शिवसेना नेते आमदार उदयसिंग राजपूत , माजी महापौर नंदकुमार घोडेले , प्रभाकर मते पाटील , महिला संपर्क संघटक सुनीता आऊलवार , सहसंपर्क संघटक सुनीता देव , जिल्हा संघटक प्रतिभा जगताप , उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर , बंडू ओक , आनंद तांदुळवाडीकर , गणू पांडे , राजू वैद्य , शहरप्रमुख बाळासाहेब थोरात आदी हजर होते .