पालम ः लघूशंकेसाठी दुचाकी थांबविलेल्या दोघांना चोर समजून मारहाण करण्यात आली. ही घटना पालम तालुक्यातील चाटोरी गावापासून 1 किलो मीटर अंतरावर सोमवारी (ता.12) रात्री 10.40 वाजता घडली. बुधवारी या प्रकरणी पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

चोरवड येथील संदीप संग्राम साबळे (वय 29) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. ते त्यांचेे भाऊ दयानंद संग्राम साबळे यांच्यासोबत दुचाकीवर गंगाखेडकडे जात होते. ते चाटोरी गावापासून 1 किलो मीटर अंतरावर लघूशंकेसाठी थांबले होते. तिथे दोन दुचाकीवरून आलेल्या युवकांनी विचारपूस करून फिर्यादीची बॅग तपासली. तदनंतर त्यांनी काही अंतराव गेल्यावर दुचाकी तसेच क्रूझर गाडीने ओव्हरटेक फिर्यादीची दुचाकी रोडवर थांबविली. दरम्यान, फिर्यादी व त्यांच्या भावास लोखंडी राॅड व काठीने मारहाण करून जखमी केले. त्यात फिर्यादीच्या भावाच्या खिशातील मोबाईल फुटला असून पाच हजार रूपये गायब झाल्याची तक्रार बुधवारी पालम पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जमादार कल्याण साठे करीत आहेत.