२५ वर्षापुर्वी दहावीनंतर सोडलेल्या शाळेत आल्यानंतर आपल्या वर्गखोल्या, आपला शालेय परिसर, आपले शिक्षक व विशेष म्हणजे तेव्हापासून प्रथमच भेटलेले वर्गमित्रांना पाहून चाळीशीत आलेले आपल्या तेव्हाच्या बालपणात रममाण झाले. परभणी शहरातील ममता कॉलनी येथील भारतीय बाल विद्यामंदिरात १९९६-९७ मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेला नुकतीच भेट दिली. कुणी दिल्लीवरुन, कुणी नाशिक तर औरंगाबाद, नांदेडसह कानाकोपऱ्यातून माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी फेसबुक, व्हॅट्सॲपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडल्या गेले. या ग्रुपवर बालपणींच्या आठवणींना तर उजाळा मिळालाच परंतु ज्या शाळेत आपले बालपण गेले, ज्या शाळेमुळे, शिक्षकांमुळे आपण इथपर्यंत पोहचलो, ती शाळा आता कशी असेल, त्या शाळेला भेट द्यावी, अशीही अनेकांची भावना झाली. या तिव्र इच्छेतूनच काही स्थानिक तर काही दुरवरचे माजी विद्यार्थीं गुलाम समीर समदानी, अंजली कोकडवार, विनय गोविंदलवार यांनी पुढाकार घेतला व त्याला अनेकांनी साथ दिली. नुकतेच सुट्टीच्या दिवशी सकाळीच हे २०-२५ माजी विद्यार्थी शाळेत धडकले. २५ वर्षानंतर त्यांच्यातही ओळखता येणार नाही इतपत बदल झाले. अनेकांनी तर एकमेकांना ओळखले देखील नाही. परंतु त्यानंतर त्यांच्या आनंदाला मोठे उधान आले. शाळा इमारत, परिसर, वर्गखोल्या, अन्य भौतिक सुविधांमध्ये झालेल्या आमुलाग्र बदलामुळे ते आश्चर्यचकित तर झालेच, त्याच बरोबर त्यांच्या शोधक नजरा परिसरात भिरभिरत होत्या. वर्गात बसून त्यांनी आपल्या आठवणी ताज्या केल्या. जुने काही प्रसंग आठवून अनेक जण भावनिक देखील झाले. आठवण म्हणून व शाळेच्या विद्यार्थ्यांना शुध्द पाणी मिळावे या हेतूने त्यांनी शाळेला एक आरओ प्लांट देखील दिली. त्यानंतर एका खासगी रिसॉर्ट मध्ये एकमेकांच्या ओळखी, कुटूंबाची माहिती, करीत असलेल्या काम, शाळेत घडलेले विविध प्रसंगांची आदान प्रदान करुन एक दिवसाच्या या भेटीचा यथेच्छ आनंद लुटला. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी वाघमारे, सेवानिवृत्त शिक्षक सी.एस. एंगडे, आर.जी. पांचाळ, एन.व्ही. आळंदकर, बी.यु. फड, श्रीमती यु.जी. मुंढे, श्रीमती दिपाली लांडगे यांनी देखील त्यांना मार्गदर्शन केले. तुकाराम गरुड, महेंद्र एंगडे, एन.पी. सुरनर हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचालन आनंद गिरगावकर, गणेश झरकर यांनी केले तर रामेश्वर जाधव यांनी आभार मानले. या स्नेहमिलनात रुपाली पारवेकर, सुचिता उटीकर, विद्या जाधव, सारीका आदमाने, माधुरी चौधरी, शैलजा मार्कंडकर, जयश्री घाटोळे, सुनिता पवार यांच्याह महेश चिलकेवार, संदीप गायकवाड, मंगेश वाघमारे, राजु महामुनी, विनायक जोशी, बालाजी जाधव, सुबोध लोलगे, संतोष पाळोदे, गजानन पंडीतकर, रणजीत खरबे, माणिक खराटे, संतराम लांडगे, दत्ता मगर आदी माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.