भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत सर्व शासकीय/निमशासकीय/खाजगी आस्थापना/ सहकारी संस्था/ शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर तसेच नागरीकांनी आपल्या घरावर व वाहनांवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्याबाबतच्या सूचना केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त झाल्या होत्या.

नागरीकांनी घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत तिरंगा ध्वज लावून आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठया उत्साहात साजरा केला आहे. हे अभियान 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीपर्यंतच मर्यादित होते. त्यानंतर उभारण्यात आलेले राष्ट्रध्वज सुर्यास्त होण्याआधीच उतविले गेले पाहिजे अशी राष्ट्रध्वजाची संहिता आहे. परंतू जिल्हयातील नागरीकांनी घरोघरी तिरंग हे अभियान संपुष्टात आलेले असतांना सुध्दा घरावरील, खाजगी आस्थापनेवरील तसेच वाहनावरील राष्ट्रध्वज अद्यापपर्यंत उतरविलेले नाही. तसेच काही ठिकाणी राष्ट्रध्वज खाली पडून, मातीत पडून व फाटून त्याचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आल्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे.

त्याअनुषंगाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत घरोघरी तिरंग हे अभियान संपुष्टात आलेले असल्यामुळे जिल्हयातील नागरीकांनी घरावरील, खाजगी आस्थापनेवरील तसेच वाहनावरील राष्ट्रध्वज तात्काळ उतरविण्यात यावे. काही ठिकाणी राष्ट्रध्वज खाली पडून, मातीत पडून व फाटून त्याचा अवमान होत असल्यामुळे अशाप्रकारचे राष्ट्रध्वज गोळा करुन संबंधित नगरपरिषद कार्यालय येथे जमा करावे. सर्व नगर परिषद कार्यालयाने त्यांचे वार्ड निरीक्षकांना आवश्यक त्या सूचना देऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी वाशिम यांनी कळविले आहे.