जुन्या आठवणी

घर-अंगण हरवले सारे, हरवून गेली बैलगाडी

ढाळजावरती बैठक मारून चालायच्या भानगडी।।

वळचणीच्या थंड सावलीत, गुरंढोरंही निजायची,

पागोळ्यांची टपटप टाळी, अंगणभर गुंजायची।।

फुंकणी, चुल, निखारे गेले, उरला नाही वास,

तपेली, चरवी हरवून गेली, धुरटला तो श्वास।।

न्हाणीघरात घंगाळ, नाहीतर दगडाचा चौरंगा,

स्टाईलने बाथरूम चकाकतं, पण उरली नाही गंगा।।

कट्टा, ओटा, माजघर, आठवते दारापुढची रांगोळी,

भिंतीतल्या त्या फडताळात लपलेले खण चोळी।।

आगवळाच्या वेण्या सोडून, आधुनिक हे आले धागे,

कुळव, पाभारी, यठाण विसरले, शिवळाट गेली मागे

खुंटीवरती लटकले सूप, पळी, ओगराळं कुठं गेलं?

चुलीवरचं जेवण आता, काहीसं जिभेवरती रेंगाळलं।।

जातं, मुसळ, उखळ, खलबत्ता, माणसे होती शहाणी,

मिक्सरच्या आवाजासोबत, हरवली मोटेवरची गाणी।।

कणग्या, ढोल्या, चौरंग गेले, भिंतीवरची गेली देवळी,

जातं, मुसळ उरले चित्रात, ताटात दिसेना गुळवणी

ढाळज, चोपणी, झरोका गेला, वाट चुकली घराची,

भिंतीही आता मुक्या झाल्या, कडी बोलेना दाराची।।

हसरी बोली जिव्हाळ्याची, अडगळीत पडली आज,

पुन्हा नव्याने खोलु या, आपल्या संस्कृतीचा राज।।

भाषा बदलते, काळ बदलतो, शब्द मात्र आठवती,

मनाच्या अडगळीपाशी जुन्या आठवणी साठवती।।

— आकाश हरिभाऊ भोरडे

निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर, जि-पुणे४१२२०९

मो. नं. 9156715275