बीड दि.17 (प्रतिनिधी) अमृत अटल योजनेचे काम जवळपास पूर्ण होत आल्याने शहरातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. डॉ.योगेश क्षीरसागर हे वेळोवेळी शहरातील विविध भागात जावून नागरी समस्या जाणून घेत असतात. यामध्ये नागरिकांकडून प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न उपस्थित केला जात होता. होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या दिवसांत कपात करून ५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा अशी प्रामुख्याने नागरिकांची मागणी होती.

या मागणीचा डॉ.योगेश क्षीरसागर यांनी माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शासन दरबारी पाठपुरावा केला होता. परिणामी अमृत अटल योजनेच्या कामाला गती मिळाली. अमृत अटल योजनेचे काम आता जवळपास पूर्ण झाले असून शहरवासियांना याचा मोठा लाभ होणार आहे. पाणीपुरवठ्याच्या दिवसांत कपात करण्यात आली असून ५ दिवसाआड शहरवासियांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांचा जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न सुटल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

यामध्ये शहींशाह नगर येथील पाण्याच्या टाकी परिसरातील शहींशाह नगर, चंपावती नगर, खासबाग, झमझम कॉलनी, आतेफ नगर, विद्यानगर प., सह्याद्री हॉटेल परिसर तर बार्शी रोड दूध डेअरी येथील पाण्याच्या टाकीवरून बार्शी रोड, बाजीराव नगर, इमामपूर रोड, बिलाल नगर, प्रकाश आंबेडकर नगर, धानोरा रोड येथील पाण्याच्या टाकीवरून संत नामदेव नगर पूर्व, पश्चिम, कृषी नगर, पंचशील नगर, स्वराज्य नगर, शिवाजी नगर, दत्त नगर, मित्र नगर, आनंद नगर, चाणक्यपुरी, ग्रामसेवक कॉलनी, कालिका नगर, गोरे वस्ती, रोशनपुरा, नगर रोड येथील पाण्याच्या टाकीवरून श्रीराम नगर, जवाहर कॉलनी, शिक्षक कॉलनी, बिंदुसरा कॉलनी, आदर्श नगर, बागवान गल्ली, बालेपीर, भक्ती कन्स्ट्रक्शन, आय.टी.आय मागे., शाहूनगर येथील पाण्याची टाकीवरून पोस्टमन कॉलनी, चक्रधर नगर, सय्यदवाडी, शाहूनगर, पांगरी रोड, पिंपरगव्हाण आदी परिसरात 5 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.तर भविष्यात जसे जसे काम पूर्णत्वाकडे जाईल तसा हा पाणी पुरवठा तीन दिवसाला करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

पाली धरणावरून पाणीपुरवठा केला जाणाऱ्या पेठ बीड, मोमीनपुरा, शुक्रवार पेठ, चांदणी चौक, सुभाष रोड, सहयोग नगर, बुंदेलपुरा, कारंजा, बलभीम चौक, धांडे गल्ली, कटकटपुरा, राजुरी वेस, बशीर गंज आदी परिसरात 6 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच ईदगाह नाका पाणी टाकीवरून पूरग्रस्त कॉलनी, माऊली नगर, गांधीनगर, शिवणी रोड, सय्यदअली नगर, मोहम्मदीया कॉलनी, इस्लामपुरा, दुबे कॉलनी, तेलगाव नाका, गजानन नगर, एकता कॉलनी आदी परिसरात यापूर्वी 17 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. तो आता 10 दिवसाआड करण्यात आला आहे.पाणी पुरवठा विभागाचे काम प्रगती पथावर असून भविष्यात बीड शहराचा पाणी पुरवठा किमान तीन दिवसाला करण्याचा प्रयत्न राहणार आहे ही बाब बीडच्या नागरिकांसाठी मोठी दिलासादायक आहे