मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भांबेरी गावच्या ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू 

औरंगाबाद(विजय चिडे)मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंबड तालुक्यातील भांबेरी गावच्या ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.कोणत्याही परिस्थितीत आम्हांला आरक्षण द्या,आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादा कक्षेत राहून ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण स्थगित करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत अख्खे भांबेरी गावचे अबाल वृद्धांसह ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत.

  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारपासून (दि. ८) भांबेरी ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली.यावेळी गावातील मराठा समाजाच्या शेकडो महिला आणि पुरुष सहभागी झाले होते.

  यावेळी मराठा आदोलक व प्रमुख उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील म्हणाले की,माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अहवालानुसार आणि राज्य सरकारच्या सर्वेक्षणातून राज्यात ओबीसींची लोकसंख्या ३७ टक्के असल्याचे दिसून आल्याने ओबीसींच्या २७ टक्के कोट्यातून आरक्षण द्यावे.मराठ्यांना पहिले आरक्षण दिले होते ते सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ५० टक्के मर्यादेहून अधिक झाले व न्यायालयाने ते रद्दबातल केले. पण आता ओबीसी लोकसंख्या ३७ टक्के असल्याचे निष्पन्न झाल्याने मराठा समाजाला २७ टक्के कोट्यातून आरक्षण मिळाल्यास न्यायालयाच्या ५० टक्के मर्यादेचेही पालन होईल.त्यामुळे शासनाने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तात्काळ आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा आम्ही जीव गेला तरी मागे हटणार नाही.

  यावेळी राज्यभरातून मराठा समन्वयक याठिकाणी उपस्थित होते. शिवाजीराजे जाधव माँसाहेब जिजाऊ यांचे वंशज यांची प्रमुख उपस्थिती होती.तर शिवव्याख्याते प्रदीप सोळुंके, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील,विलास पांगरकर राज्यसमन्वय नाशिक, महेश डोंगरे राज्य समन्वयक सोलापूर,सुभाष जावळे राज्य समन्वयक परभणी, किशोर चव्हाण, राज्य समन्वयक संभाजीनगर,अमित घाटगे, राज्य समन्वयक परळी,रमेश पोकळे, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा बीड,दिलीप पाटिल, राज्य समन्वयक कोल्हापूर, राजेंद्र दाते पाटिल राज्य समन्वयक संभाजीनगर,विजय काकडे,आप्पासाहेब कुढेकर,प्रा. चंद्रकांत भराट, छावाचे संतोष जेधे आदींची उपस्थिती होती.

   यावेळी मराठा आदोलक मनोज जरांगे,पंडीतराव कनके ,विष्णुपंत केजभट , दिपक ठोबंरे ,उमेश बर्वे,दादासाहेब घाटगे सह आदी आमरण उपोषणाला बसले आहेत.