निवडणुकीतील राजकारण बाजूला ठेवून नुतन पदाधिकाऱ्यांनी गावच्या विकासाला चालना द्यावी-माजी मंत्री, आ.अमित  देशमुख 

औसा विधानसभा मतदारसंघातील नूतन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य

 आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांचा सत्कार

 औसा प्रतिनिधी : पंचायत राज व्यवस्थेमुळे विधिमंडळ आणि संसद एवढेच ग्रामपंचायतीलाही अधिकार प्राप्त झाले आहेत, त्यामुळे नुतन पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीतील राजकारण बाजूला ठेवून आता गावच्या विकास प्रक्रियेला चालना द्यावी असे आवाहन करून यावेळी याकामी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. 

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते रविवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि औसा काँग्रेस कमिटीच्या वतीने औसा येथे आयोजित केलेल्या औसा विधानसभा मतदारसंघातील नूतन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, यांचा सत्कार औसा शहरातील श्री मुक्तेश्वर विद्यालय येथे करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे माजी कृषी सभापती हल्लाप्पा कोकणे, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे, सचिव अभय साळुंखे, व्हा.चेअरमन विजय देशमुख, चेअरमन गणपत बाजुळगे, औसा तालुका काँग्रेसचे निरीक्षक सर्जेराव मोरे, माजी उपाध्यक्ष नारायण लोखंडे, औसा शहर काँग्रेसचे निरीक्षक समद पटेल, बाबासाहेब गायकवाड, औसा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, औसा शहर काँग्रेसचे अध्यक्ष शकील शेख, मौलाना कलीमुल्ला कादरी, अजहर हाश्मी, उदयसिंह देशमुख, दीपक राठोड, प्रवीण सूर्यवंशी, खुदमीर मुल्ला, संभाजी पाटील आदीसह तालुका काँग्रेसचे काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, औसा विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

औसा विधानसभा मतदारसंघातील औसा तालुक्यातील आंदोरा, एकंबीवाडी, एकंबीतांडा, एरंडी उटी कणेरी, कवळी, किनीथोट, काळमाथा, कवठा, लातूर, कवठा, केज, आणि निलंगा तालुक्यातील अंबुलगा, कासारशिरशी, चांदोरी, चिलवंतवाडी, जेवरी आदी गावातील नूतन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक यांचा सत्कार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी करून पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर या काँग्रेस नेत्यांच्या काळात खूप विकासकामे झाली. ग्रामीण भागाचा विकास काँग्रेसने केला येणाऱ्या काळात ग्रामीण भागाचा विकास काँग्रेस पक्षच करू शकेल देशात झालेल्या सत्ता बदलाने पदरी सामान्यांच्या काहीच पडले नाही. लातूरची जिल्हा परिषद ही भृष्टाचारने बरबटलेली आहे. सरपंच उपसरपंचांना काम करण्यासाठी दुसऱ्यांचे खिसे भरावे लागतात ही लातूरची संस्कृती नाही. लातूरच्या काँग्रेस नेत्यांनी लातूर हे माझ आहे म्हणून लातूरला नेहमी मदत केली. लातूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थाला गालबोट लागु दिले नाही. सर्वप्रथम लोकनेते विलासराव देशमुख व माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे ग्रामपंचायतीत पहिल्यांदा निवडून आले बाभळगाव ग्राम पंचायतीचे माझ्या आजोबांनी ही प्रतिनिधित्व केले, काँग्रेसच्या नेत्याला स्थानिक स्वराज्य संस्थातील पदाधिकाऱ्यांच्या स्वप्नांची माहिती आहे, काँग्रेसने अनेक कायदे लोकोपयोगी केले आहेत. 

पुढे बोलताना ते म्हणाले की लोकनेते विलासराव देशमुख म्हणायचे लोकसभा, विधानसभा प्रमाणे ग्रामसभा यांना तसेच अधिकार आहेत. गावाच्या विकासाचे अधिकार ग्रामसभेला आहे. आजचा सरपंच हा उद्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भारतामध्ये अग्रगण्य स्थान मिळवले आहे. ती पाच लाख रुपयाचे बिनव्याजी कर्ज शेतकऱ्यांना देते. या सर्व कामातून सामाजिक बांधिलकी ही काँग्रेसने जोपासली आहे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा व लोकसभेत काँग्रेसचा तिरंगा फडकवण्यासाठी कामाला लागावे, संत शिरोमणी मारुती महाराज कारखाना निवडणूक आपण जिंकलो लोकनेते विलासराव देशमुख यांनी या कारखान्याला मदत केली, ऊस उत्पादक शेतकरी यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण निवडणूक लढवली, या कारखान्यात सहवीज निर्मिती, आसवनी प्रकल्प, साखर संकुल उभे करू असे सांगून त्यांनी आपसात मतभेद न करता काँग्रेस पदाधिकारी यांनी काम करावे विकासाच्या यात्रेत २४ तास पदाधिकाऱ्यांनी जनतेसाठी काम करावे असेही आवाहन याप्रसंगी केले. 

या कार्यक्रमाच प्रास्ताविक औसा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी यांनी केले तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे, सचिव अभय साळुंखे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नारायण लोखंडे, माजी कृषी सभापती जिल्हा परिषद हल्लाप्पा कोकणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन सूर्यवंशी यांनी केले तर शेवटी आभार शहर काँग्रेस अध्यक्ष शकील शेख यांनी मानले.