रत्नागिरी : खड्डे, धुळीने भरलेले रस्ते पहिले सुस्थितीत करा म्हणून गेल्या काही महिन्यांपासून नागरिक टाहो फोडत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने १६ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात येणार आहे कळताच प्रशासनाने मुख्यमंत्री जाणार असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे जोमाने सुरू केली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मार्गात एकही खड्डा, धुळीने भरलेला रस्ता येणार नाही अशाप्रकारची आखणी करुन खड्डे भरणीची कामे सुरू करण्यात आली आहेत.

त्यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन सध्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात खूपच व्यस्त असल्याचे दिसून येते. ज्या भागात मुख्यमंत्री फिरणार आहेत त्याच भागातील रस्ते साफसफाई अन् डागडुजी केली जातेय. मात्र शहरातील बहुतांशी स्थळे या साफसफाईपासून वंचितच आहेत. जर या भागात मुख्यमंत्री येणार असते तर या भागांचीही स्वच्छता झाली असती, असे मत सामान्य नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्ताने रत्नागिरी शहरात साफसफाई व डागडुजीच्या कामांना वेग आला आहे. काही दिवसांपासून रस्ते, दुभाजक नगरपालिकेच्या अग्निशमनसाठी वापरण्यात येणाऱया बंबाने धुण्याचे काम सुरु आहे. दुभाजकांबर लावलेली झाडेही आता व्यवस्थित कटिंग करण्याचे काम सुरु आहे. कित्येक महिने खड्डय़ांचे साम्राज्य असलेल्या आठवडाबाजार ते काँग्रेस भवन या परिसरातील रस्ताही यानिमित्ताने व्यवस्थित करण्यात आला आहे. फक्त मुख्यमंत्री दौरा नाहीतर अन्य कुणा मान्यवरांचा दौरा असेल तेव्हाच नगरपालिका प्रशासन खडबडून जागे होते व आपली सर्व यंत्रणा कामाला लावून कामे तडीस नेण्यात येतात. मग हीच यंत्रणा दररोज काम करताना कुठे जाते, असा सवालही नागरिकांमधून उपस्थित होत आहे.