बीड दि.3 (प्रतिनिधी) - वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असतो त्याचा विनियोग योग्य पध्दतीने केला तर गावचा विकास साधता येतो. जो जनतेची कामे करतो तो स्पष्ट आरशा सारखा चमकतो असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

 गुरूवार दि.3 रोजी बीड तालुक्यातील मंझेरी हवेली येथे गुजर परिवाराच्या वतीने दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी ह.भ.प.बबन महाराज बहिरवाळ, अरूण डाके, दिनकर कदम, नरसिंह गुजर, अंबादास गुजर, नामदेव बहिरवाळ आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी कामे ठप्प झाले होते आता मात्र सगळे सुरळीत झाले आहे. गौरी गणपती उत्सव, दिपावली आनंदाने साजरी झाली. अनेकांना अडचणी आल्या, अनेकजण दु:खात होते. तेंव्हा त्यांना धीर देण्यासाठी जमेल तशी मदत करावी लागली. आपल्या माणसाची काळजी आपणच घ्यावी लागते. नवीन वातावरण आहे. बदल होत आहेत. तंत्रज्ञान विकसीत झालयं संपर्काची साधणे वाढली आहेत. हवं ते उपलब्ध होत आहे. याचा योग्य वापर करून आपण आपल्यातील बदल करून घेतला पाहिजे. सोशल मिडियावर असणारे चित्र त्याचं वास्तव्य काय आहे? याचाही शोध घेतला पाहिजे. अनेकजण सोशल मिडियावर विकास करू लागले आहेत. त्याच प्रत्यक्षात असणार कामं समोर दिसतं का ? ते पहायला पाहिजे. गावात अनेक कामे केली आहेत. जी प्रलंबीत आहेत त्यासाठी प्रयत्न करून ती पुर्ण करू.कामे करतांना जनतेचा विचार करूनच केली पाहिजेत. गावचा विकास करून घेण्यासाठी गावचा लोकप्रतिनिधी महत्वाचा असतो. या भागात मांडवजाळी, करचुंडी, कपिलधार या गावात विकासाची कामे करून घेतली आहेत. त्यामुळेच या भागातील जनता वेळोवेळी पाठीशी खंबीरपणे उभी राहते. अशीच साथ कायम ठेवावी असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी अच्युत शेळके, श्रीराम बहिर, रंजित गुजर, सुरेश गुजर, गणेश बहिरवाळ, भास्कर बहिरवाळ, हरिश्‍चंद्र वराडे, अशोक मस्के, हनुमान घोशिर, अशोक बहिरवाळ, दादाराव बहिरवाळ यांच्यासह परिसरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.