रत्नागिरी : जिल्ह्याला उद्योगमंत्री पद मिळाल्यानंतर, रत्नागिरीच्या विकासासाठी आणि नवनवीन उद्योगाची निर्मिती व्हावी यासाठी मागणी केली जात आहे. एमआयडीसी भागामध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असून, त्या पडून राहण्यापेक्षा त्याचा वापर एखाद्या उद्योगासाठी करण्यात यावा. जेणेकरून स्थानिक तरुणांना त्यामध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकेल.

रत्नागिरीमध्ये किमान ३-४ मोठ्या आयटी कंपन्या, अन्य मध्यम कंपन्यांना विशेष सुविधा देऊन निमंत्रित करावे. जेणेकरून रत्नागिरीच्या आर्थिक विकासाला व प्रामुख्याने युवकांचे भविष्य उज्ज्वल होईल. यासाठी विशेष लक्ष देऊन प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

ॲड. पटवर्धन यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रत्नागिरीमध्ये गेल्या अनेक वर्षात नवीन कंपनी सुरू झालेली नाही. फिनोलेक्स व जिंदाल या दोनच मोठ्या कंपन्या रत्नागिरीमध्ये आहेत. गद्रे मरीन या कंपनीनेही सुमारे ४०० कामगारांचा विचार न करता व्यावसायिक कारणास्तव येथील युनिट मंगलोर आणि अन्यत्र हलवण्याची माहिती आहे. थोडक्यामध्ये रत्नागिरीत नवीन उद्योग आले नसल्याने रत्नागिरीतील उच्चशिक्षित युवा वर्गाला मोठ्या शहरांमध्ये करियरसाठी जावे लागत आहे. परिणामी रत्नागिरीतील आजूबाजूची गावे तरुणाई कामाधंद्यानिमित्त बाहेरच जाऊ लागल्याने वस्ती उजाड होऊ लागली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक मोठी इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. त्यातून मोठ्या संख्येने इंजिनियर्स प्रतिवर्षी बाहेर पडत आहेत. परंतु, या सर्वांना चांगल्या संधीसाठी आणि उज्वल भविष्यासाठी स्थानिक ठिकाणी संधीच उपलब्ध नसल्याने बाहेरगावी जावे लागत आहे. मात्र या युवकांना रत्नागिरीत संधी उपलब्ध व्हावी, यासाठी आयटी क्षेत्रातल्या मोठ्या अगर मध्यम आकाराच्या नामांकित कंपन्यांना रत्नागिरीमध्ये काही विशेष सुविधा देऊन निमंत्रित करावे. आयटी क्षेत्रातील कंपन्या रत्नागिरीत आल्या तर कंपन्यांना होणारा विरोध प्रामुख्याने प्रदूषण आदी मुद्दे अडथळा निर्माण करणार नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.