परभणी, दि.15 - जल बिरादरी आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का 75 वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्ताने चला जाणून घेऊया नदीला या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील दुधना नदी संवाद यात्रेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते जल कलश आणि राष्ट्रध्वज वितरण करून करण्यात आले.

यावेळी भुजल सर्वेक्षण अधिकारी प्रशांत पौळ, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक चंद्रकांत गांगुर्डे, अरविंद लोणकर, किरण मोहोळ, विकल्प संस्थेच्या लता साळवी आणि विद्यार्थी/विद्यार्थींनी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या नदी संवर्धनाचे महत्व व जबाबदारीची जाणीव जनतेला करुन देणे गरजेचे आहे. हा उपक्रम स्तुत्य असून यामध्ये गावपातळीवर जिल्हा प्रशासन पण आवश्यक ते सहकार्य करेल. 

यावेळी जल कलश रमाकांत बापू यांनी व राष्ट्रध्वज सारंग साळवी यांनी स्वीकारला.