औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबईतील दसरा मेळावा संपल्यानंतर गावाकडे माघारी निघालेल्या ७५ वर्षीय महिलेला वैजापूर तालुक्यातील जरूळ शिवारात गुरुवारी पहाटे अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली . यात महिलेचा मृत्यू झाला . कमलबाई देवाजी पाठक ( रा . डिग्रस , ता . सिल्लोड ) असे मृत महिलेचे नाव असून त्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील आहेत . मेळाव्यानंतर सिल्लोडकडे निघालेल्या बसमध्ये कमलबाई यांच्यासोबत त्यांचा पुतण्या दिलीप भिवसन पाठक व इतर महिला होत्या . वैजापूरजवळील जरूळ फाटा येथे पहाटे ५.३० वाजता बसचालकाने लघुशंकेसाठी एसटी थांबवली होती . त्यादरम्यान महिला प्रवाशांसोबत कमलबाई खाली उतरल्या . रस्ता ओलांडताना त्यांना वैजापूरकडून शिऊरकडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने जोरदार धडक दिली . या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विजय नरवडे यांनी घटनास्थळी भेट दिली . कमलबाई यांना वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले . याप्रकरणी अज्ञात वाहनचालकांवर वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला