आदाड येथील सामाजिक सभागृहाचे आमदार दळवी यांच्या हस्ते उद्धघाटन

    ज्या पक्षांनी लोकांची मते घेऊन फसवणूक केली ते पक्ष आगामी काळात दिसणार नाहीत.रायगडच्या माजी पालकमंत्र्यांनी फक्त त्यांच्याच मतदार संघात निधी नेला व कामे केली.वास्तविक संपूर्ण रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सर्व भागांना समान न्याय देणे आवश्यक होते.सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम लोकप्रतिनिधी यांचे असते.लोकांना न्याय देण्यासाठीच रायगडच्या आमदारांनी परिवर्तन घडवून आणले आहे.आगामी काळात अलिबाग व मुरुड मधील ७० टक्के शेकाप खाली होणार आहे.मुरुड तालुक्याचा विकास करण्यासाठी या तालुक्यातील २४ ग्रामपंचायती मी दत्तक घेत असल्याचे यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी जाहीर केले आहे.

अदाड येथील सामाजिक सभागृहाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते उद्धघाटन फीत कापून करण्यात आले.यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी,रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी ,भाजप नेते ऍड महेश मोहिते,मुरुड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर,जिल्हा संघटिका शुभांगी करडे,माजी सरपंच भाई सुर्वे,संघटक दिनेश मिणमिने,सरपंच हरिचंद्र भेकरे,अदाड शाखा प्रमुख नितेश पाटील,उप शाखा प्रमुख गजानन पाटील,निलेश घाटवळ,सुनील दिवेकर,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत बेलोसे,मुरुड तालुका संघटक यशवंत पाटील,मुरुड शहर अध्यक्ष संदीप पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले कि, आगामी होणाऱ्या निवडणूक शिंदे गट भारतीय जनता पार्टीला सोबत घेऊन लढणार आहे.आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व नगरपरिषद दोघेही सोबत लढणार असून यामध्ये कोणतेही मतभेद होणार नाहीत.फक्त ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे प्राबल्य आहे त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी.तसेच शासनाच्या सर्व शासकीय कमिट्यांवर भारतीय जनता पार्टी जी नावे सुचवले जातील ती नावे ग्राह्य मानून त्या त्या कमिटीन्वर सुद्धा घेण्यात येणार आहे.दोन्ही पक्ष एकत्र येऊन मोठ्या शिताफीने निवडणूक लढवून विरोधकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.मुरुड शहरासाठी राज्य शासनाकडून ५५ कोटी रुपये देण्यात आले असून येथील विकासकामे सुरु आहेत.तर या तालुक्यातील ग्रामीण भागासाठी शंभर कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या असून लवकरच हि सुद्धा कामे सुरु होणार असल्याचे संकेत यावेळी त्यांनी दिले.अदाड गावातील सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी आमदार दळवी यांनी दिले.

यावेळी भाजपचे नेते ऍड महेश मोहिते यांनी आपल्या भाषणात नमूद केले कि, मागच्या आमदारांनी लोकांना दिलेले शब्द पूर्ण केली नाहीत परंतु आमदार महेंद्र दळवी यांनी अदाड गावाला दिलेला शब्द पूर्ण केल्यामुळे आज एक भव्य दिव्य समाज मंदिर पहावयास मिळत आहे.यावेळी आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीस प्राधान्य दिले गेले पाहिजे.भाजप च्या कार्यकर्त्यास सुद्धा शासकीय कमिट्यांवर स्थान मिळाले पाहिजे.सोबत निवडणूक लढवल्या तर चांगले यश संपादन करू असा आत्मविश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.तसेच मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या काळात मुरुड तालुक्यातील म्हालोर या ठिकाणी महेंद्र अँड महेंद्र कंपनीचा करार होऊन येथे मेडिकल टुरिझम प्रकल्प उभारला जाणार होता.सदरचे काम मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जावा अशी मागणी सुद्धा ऍड मोहिते यांनी या वेळी केली.

यावेळी भरत बेलोसे यांनी सांगितले आहे की,कोट्यवधींचा निधी आमदार महेंद्र दळवी यांनी मुरूड तालुक्यातील विकास कामांसाठी दिले आहे

सदरील कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांच्या झटपट काम करण्याच्या शैलीवर प्रभावित होऊन अदाड,बेलीवाडी,व वडघर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.सदरच्या पक्ष प्रवेशामुळे स्थानिक आमदार दळवी यांची ताकद वाढली आहे.

अदाड येथील सामाजिक सभागृहाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते उद्धघाटन फीत कापून करताना दिसत आहेत.त्यांच्या समवेत भाजप नेते ऍड महेश मोहिते,जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी,माजी सरपंच भाई सुर्वे,जिल्हा संघटिका शुभांगी करडे आदी मान्यवर दिसत आहेत.तर दुसऱ्या छायाचित्रात आमदार दळवी यांच्या कार्यपद्धतीवर खुश होऊन अदाड,बेलीवाडी,व वडघर येथील लोकांनी शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत