सोलापूर - बाल व मातामृत्यू रोखण्यासाठी बालकांच्या जीवनाची हमी घ्या तरच बालमृत्यु रोखतां येतील. बालमृत्यु ही सामाजिक समस्या आहे. सामाजिक जबाबदारी घेऊन काम करा. असे भावनिक आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. 

“जीवनाची हमी बालमृत्यु कमी “ या अत्यंत महत्वकांक्षी कार्यक्रमाचा शुभारंभ आज दक्षिण सोलापूर तालुक्यांतील औराद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आला. सिईओ स्वामी यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यात या मोहिमेस उत्साहात सुरूवात झाली आहे. स्वत: सिईओ स्वामी यांनी औराद येथे जाऊन अभियानाच्या नियोजनाची पाहणी करून मार्गदर्शन केले. 

पुढे बोलताना सीईओ स्वामी म्हणाले, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांच्यासह आशा वर्कर्स ग्रामीण भागात आरोग्य सेवा तसेच कुपोषण मुक्तीसाठी‌ नेहमीच चांगले काम करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी साथ देण्याची गरज आहे. गावचे सरपंच व ग्रामसेवक यांनी मनावर घेतल्यास मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यात शासकीय यंत्रणांना निश्चितच यश मिळेल. त्याचबरोबर बालविवाह हा मातामृत्यू व बालमृत्यूस कारणीभूत असलेला महत्त्वाचा घटक आहे. बालविवाहावर जर संपूर्ण प्रतिबंध आणायचा असेल तर प्रत्येक ग्रामस्थांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद यंत्रणेतील सर्वजण ही मोहिम यशस्वी करणे साठी प्रयत्न करत आहेत आणि “जीवनाची हमी बालमृत्यु कमी" ही मोहीम आपण नक्कीच यशस्वी कराल याबाबत काहीच शंका नाही. 

प्रारंभी सीईओ दिलीप स्वामी यांच्या शुभहस्ते धन्वंतरी पूजन व दिपप्रज्वलन करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. 

प्रारंभी तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिगंबर गायकवाड यांनी आरोग्य विभाग व बालकल्याण विभाग यांनी कोविड काळात उत्तम समन्वय साधत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यापुढेही असाच समन्वय साधून ही मोहीम यशस्वी करू असा विश्वास व्यक्त केला.

सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात विखुरला आहे असे सांगून सिईओ स्वामी म्हणाले, सरपंच व ग्रामसेवक व गावातील शासकीय सर्व कर्मचारी यांनी एकही बालमृत्यु होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. संधी म्हणून आव्हान स्वीकारा. देवाला नशीबाला दोष देणे पेक्षा बाळाची व आईची काळजी घेतलेस बालमृत्यु कमी होणेस मदत होईल. हा विषय, बालविवाह, कुपोषण, अस्वच्छता यामुळे बालमृत्यु व माता मृत्यु होत आहेत. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. उपस्थित सर्वांना कुपोषण मुक्तीची शपथ देण्यात आली.

यावेळी औरादचे सरपंच शांतकुमार गडदे, दक्षिण सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिगंबर गायकवाड, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे, वैद्यकीय अधिकारी डॉ निलम घोगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा पवार व वैद्यकीय अधिकारी जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिकार्जुन देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा पवार यांनी मानले.

आरोग्य कर्मचारी एस व्ही वाघमारे, एस डी दुपारगुडे, एस एम कोळी, पी बी सोळंकी यांनी कार्यक्रम यशस्वी करणे साठी प्रयत्न केले. आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स बहुसंख्येने उपस्थित होते. 

सिईओ स्वामी यांनी स्वत केली शुगर तपासणी ..! 

औराद येथे कार्यक्रम संपलेनंतर सिईओ दिलीप स्वामी यांनी थेट प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करीत आरोग्य कर्मचाऱ्याकडून आपली शुगर तपासणी करून घेतली. मशीन दुरूस्त आहे का याची खात्री करून घेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरती हेसे यांनी स्वामी यांची ब्लड शुगर तपासणी केली.

बालमातेला दिला सिईओ यांनी दिलासा..! 

सिईओ दिलीप स्वामी आरोग्य केंद्रातून बाहेर पडताना गाडीत बसणेपुर्वी इमारतींच्या बाजूस बाळ काखेत घेऊन उभारलेल्या मातेची आस्थेने विचारपूस करून औषधौपचार व्यवस्थित मिळतात का ? बाळाला काय आजार झाला आहे असे विचारून आधार दिला.

बालमातांशी हितगुज साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेबाबत चौकशी केली. 

आईचे अंगाखाली दबून बाळाचा मृत्यु..! 

“जीवनाची हमी बालमृत्यु कमी “ हे अभियान घेणे पाठी मागचा उद्देश्य याचे मुळ शोधून काढणे व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हा आहे. याचा बारीक सर्वेक्षण करून अभ्यास केला असता आईचे अंगाखाली दबून बाळाचा मृत्यु होत आहे. याबाबत गांभीर्याने स्तनदा माता यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. शुन्य ते एक वयोगटातील बाल माता चा संवाद आराखडा तयार करणे आवश्यक आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.