सोलापुर :-  शस्त्रक्रिया करताना संपूर्ण शरीराला भूल देण्याऐवजी आवश्यक भागालाच भूल देऊन शस्त्रक्रिया करण्यासंबंधीचे तसेच इतर तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांकडून राष्ट्रीय परिषदेत करण्यात आले.

सोलापूर भूलतज्ज्ञ संघटनेतर्फे रविवारी परिषद पार पडली. अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. वेंकट गिरी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. अंजली भुरे, सचिव डॉ. नवीन मल्होत्रा, नियोजित अध्यक्ष डॉ. एम. व्ही. भीमेश्‍वर, नियतकालिकाचे संपादक डॉ. सुखविंदरसिंग बाजवा, महाराष्ट्र राज्य भूलतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मनिषा काटीकर, सचिव डॉ. अविनाश भोसले, डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेजच्या भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ. पुष्पा अग्रवाल, सोलापूर भूलतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ. कविता निवर्गी, सचिवा डॉ. वैशाली येमुल, महाराष्ट्र कौन्सिल मेंबर डॉ. सोनिया गांधी उपस्थित होते. यावेळी डॉ. अय्यर, डॉ. बी. शिवशंकर, लता शिवशंकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सुधा अय्यर यांच्या स्मरणार्थ 27 वर्षांपासून या परिषदेचे आयोजन करण्यात येते. आंतरराष्ट्रीय भूलतज्ज्ञ डॉ. बालावेंकट सुब्रमण्यम यांनी यावेळी 'स्थानीय भूल' या विषयावर मार्गदर्शन केले. पूर्वी शस्त्रक्रिया करण्यासाठी संपूर्ण शरीराला भूल दिली जात असे. मात्र गेल्या काही वर्षांत जिथे शस्त्रक्रिया करायची आहे त्याचठिकाणी भूल देऊन जटिल शस्त्रक्रियाही करता येईल, असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे अनेक क्लिष्ट बाबी सहज साध्य झाल्या आहेत, असेही डॉ. बालावेंकट सुब्रमण्यम यांनी यावेळी सांगितले.

दिवसभराच्या परिषदेत डॉ. हेमंत शिंदे, डॉ. सुखविंदरसिंग बाजवा, डॉ. मनिषा काटीकर, डॉ. नवीन मल्होत्रा, डॉ. अंजली भुरे, डॉ. माधुरी कुरडी, डॉ. अनिता नेहते, डॉ. सुरेखा शिंदे आदींनी विविध विषयांवर मनोगत व्यक्त केले. डॉ. वैशाली जोशी यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. सचिवा डॉ. वैशाली येमुल यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र भूलतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मनिषा काटीकर, सोलापूर भूलतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. कविता निवर्गी, सचिवा डॉ. वैशाली येमुल, डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेजच्या भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ. पुष्पा अग्रवाल, डॉ. वैशाली जोशी, डॉ. सोनिया गांधी आदी उपस्थित होते.