भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या परभणी शहर शाखेतर्फे आज शुक्रवारी ( दि. 12 ) 375 फुट तिरंगा ध्वज यात्रा काढण्यात आली. शहरातील शनिवार बाजारातून सकाळी साडेनऊ वाजता या 375 फुट तिरंगा यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी युवा कार्यकर्ते तसेच हजारो शालेय विद्यार्थी शिस्तबद्ध पद्धतीने तिरंगा ध्वज हातात घेऊन येथून निघाले, तेव्हा " भारत माता की जय " वंदे मातरम ' या जयघोषाने शनिवार बाजार परिसर अक्षरशः दणाणला. पदयात्रेच्या अग्रभागी भारत मातेची भव्य प्रतिमा होती. या प्रतिमेचे यावेळी विधिवत पूजन करण्यात आले. पदयात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर , विविध संस्था , संघटना , प्रतिष्ठानचे पदाधिकारी हातात तिरंगा फडकवत , स्वातंत्र्याच्या जयघोष करीत निघाले होते . नानलपेठ कॉर्नर , शिवाजी रोड , छत्रपती शिवाजी चौक , गुजरी बाजार , गांधी पार्क , स्टेशनरोड, नारायण चाळ कॉर्नर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही यात्रा निघाली. बाजारपेठेत जागोजागी व्यापाऱ्यांसह विविध संस्था, संघटनाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या l तिरंगा यात्रेवर पुष्पवृष्टी करीत तिचे स्वागत केले. भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष करण्यात आला. या यात्रेत सर्व विद्यार्थी , प्राध्यापक , प्राचार्य , शिक्षक , मुख्याध्यापक , डॉक्टर , वकील व अन्य नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी होते . अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी , कार्यकर्त्यांनी या यात्रेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.